March 28, 2024

Vishwakarma University – Centre of Communication for Development

An Initiative of Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune

केशकर्तनालय व्यावसायिकांचा खडतर जीवन संघर्ष.. हातातोंडाची गाठ पडणे मुश्कील, पण धीराने सामना

Photo Credit : Pratiksha Jadhav

पुणे, ऑक्टोबर ५, २०२० (वि वि वि वा के) : कोविड १९ च्या या काळात सर्वात कठीण परिस्थिती असणाऱ्यामध्ये केशकर्तनालयाचे मालक आणि त्यांचे कर्मचारी यांचा समावेश करता येइल . पण हे व्यावसायिक या खडतर काळाचा सामना धीराने करीत आहे असे एका पाहाणीत आढळून आले आहे. या व्यावसायिकांनी आता हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याचे या पाहणीत त्यांनी सांगितले. मात्र अद्यापही हातातोंडाची गाठ पडणे मुश्कील झाले आहे.

पुण्याच्या विश्वकर्मा विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यानी नुकतीच आपापल्या मूळ गावात ही  नमुना पाहणी केली. पुणे, इंदूर-पिथठपूर (मध्य प्रदेश), विजापूर (कर्नाटक), जमशेदपूर , यवतमाळ, अहमदनगर जिल्हात श्रीरामपूर  तालुक्यातील पाथरे, मलकापूर जवळचे कराड या ठिकाणी त्यांनी ही माहिती त्यांनी मिळवली.  

शासनाने जून,२८ पासून केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लर यांना व्यवसाय परत चालू करायला परवानगी दिली, पण सोशल डिस्टन्सिंग चे कडक निर्बंध कायम ठेवले. त्यातुन हे व्यावसायिक कशी वाटचाल करीत आहेत याची माहिती घेणे हा या पाहणीचा उद्देश होता, यातील ठळक निष्कर्ष पुढील प्रमाणे:

Photo Credit : Sakshi Kadam
  • मार्च मध्ये लोकडाउन सुरु झाले तेव्हा देशात सर्वच क्षेत्रात होते तसेच केशकर्तनालये देखील बंद झाले. जमेल त्यांनी आपापल्या मूळ गावी परत जाऊन काही धडपड करून पाहिली. अनेकांची उपासमार झाली.
  • शासनाचे निर्बंध हळूहळू कमी व्हायला लागले, पण बंद पडलेली दुकाने अजून पूर्ण क्षमतेने व्यवसाय करू शकत नाहीत, अनेकांची उपासमार आजही होतेच आहे.
  • त्या उलट शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, सेफ्टी किट्स, मास्क आणायला लावली.
  • पण ही गुंतवणूक करून सुद्धा अद्याप ग्राहक पूर्वीच्या संख्येने येत नाही.
  • व्यावसायिक, त्यांचे कुटुंबीय आणि ग्राहक यांच्या साठी एवढी गुंतवणूक परवडत नसताना देखील करावीच लागते.
  • पुण्यात भांडारकर पथावर असलेल्या बटरफ्लाय पार्लरचे पार्टनर श्री शामराव काशीद यांनी ग्राहकांच्या घरी जाऊन सेवा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या पार्लर चे जुने ग्राहकच मुख्यतः घरी बोलावतात. त्यांनी शिफारस करून काही नवीन ग्राहकही त्यांना मिळालेले आहेत. डिस्पोजेबल पर्सनल प्रोटेक्षन इक्विपमेंट किट यासाठी खर्च करावाच लागतो. त्याचा भार ग्राहकांवरच पडतो. त्यामुळे दर जास्त ठेवावा लागतो. त्यामानाने ग्राहकांची संख्या खूप कमी झाली आहे. तरी सुद्धा सुजाण ग्राहक हे ज्यादा पैसे द्यायला तयार होत आहे ही एक चांगली बाजू आहे.
  • लगतच्या गोखलेनगर भागातील योगेश मोरे यांच्या दुकानात तीन सेवक होते पण लॉकडाउनच्या काळात ते उत्तर प्रदेशात आपल्या गावी गेले. त्यानंतर ते अद्याप परत आलेच नाहीत.
  • काहीजण घरी सेवा घ्यायला बोलावतात पण सन्मानपूर्वक वागणूक मात्र देत नाहीत. कुठेतरी कोपऱ्यात, जिन्या खाली, कार पार्क मध्ये आम्ही अशी सेवा द्यावी अशी अपेक्षा असते.   जास्तीचा खर्च देणे सुद्धा त्यांना जिवावर येते.
  • पुण्यातील भवानी पेठेत शेख वसीम यांचेदेखील केशकर्तनालय मार्चपासून बंद होते. पूर्वी महिन्याला पंचवीस-तीस तरी ग्राहक यायचे, आता पाच-सहा आले तरी नशीब अशी अवस्था आहे.
  • जितेंद्र चव्हाण.  पीथमपुर, मध्य प्रदेश. यांचे बंधू देखील त्यांच्याच दुकानात काम करतात याखेरीज आणखी एक व्यवसायिक त्यांच्यासारखेच अडचणीत आले. सगळ्यांना किराणा उधार उसनवार आणि कर्ज यावर दिवस काढावे लागले.
  • ओळखीच्या लोकांनी मदत केली. या बिकट परिस्थितीत त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना ऑनलाइन प्रशिक्षणासाठी मोबाईल फोन विकत घेणे अपेक्षित होते. पण त्यासाठी पैसे कोठे होते!  त्यामुळे अद्याप मुलं शाळेत जाऊ शकलेले नाहीत. शिक्षण बंदच आहे.
  • भवानी पेठेतच अब्रार शेख यांचेही दुकान आहे. आधी पूर्ण बंद ठेवावे लागले. जुलैमध्ये दहा-पंधरा ग्राहक आले. पण अद्याप त्यांना कोणी घरी सेवा द्यायला बोलावलं नाही. अब्रार यांच्या आजोबांनी चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या दुकानात आता पर्यंत तीन कर्मचारी होते त्यातील दोघे लोक डाऊन मध्ये सोडून गेले ते अद्याप आलेले नाहीत.
Photo Credit : Umang Bafna
  • महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात राजेंद्र उद्धवराव गायकवाड यांचे दुकान जनता कर्फ्यू च्या दिवशीच बंद झाले. नंतर त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागली. दुकानासाठी सामान पण त्यांनी घेतले पण  एक जुलै पर्यंत घेतल ग्राहक आलेच नाहीत. सेफ्टी किटसाठी चा खर्च अंगावर पडला. अशी सगळी रडकथा असताना माणुसकीचे दर्शन देखील त्यांना झाले. घर मालकाला पैसे देणे अपेक्षित होते, पण ते देऊ शकत नाहीत तरी घरमालकांनी अद्याप तगादा लावलेला नाही.  
  • अनेक जुन्या ग्राहकांनी आर्थिक मदत केली. लॉकडाऊन पूर्वी सुद्धा श्री गायकवाड काही ग्राहकाच्या घरी जाऊन सेवा द्यायचे. या ग्राहकांत सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आणि काही अपंग यांचाही समावेश आहे.संसर्गाच्या भीतीने  आधी ग्राहक येत नव्हते. आता हळूहळू यायला लागले आहेत. पुरेशी खबरदारी आम्ही घेतो हे पाहून ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. अनेक ग्राहक सेफ्टी किट चेही पैसे देतात.  काहींनी खूपच अडचणीच्या काळामध्ये किराणा आणि अन्नधान्य यासाठी ज्यादा पैसेही द्यायला सुरुवात केली. काही ग्राहक तर इतके सहृदय निघाले की महिन्यातात चार-पाच वेळा किराणा, अन्न धान्य यांचे पाकीट मागता आणून देऊ लागले आहेत.
  • आणखी एक अनपेक्षित अनुभव अनेक व्यावसायिकांना आला आहे. त्यांचे दुकान बंद असताना 80 टक्के ग्राहकांनी आपल्या घरच्याच नात्यातल्या स्त्री पुरुषांकडून कटिंग करणे, दाढी करणे अशी कामे करून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे व्यावसायिकांचा धंदा बुडाला. 
  • पीथमपुरच्याच  ज्योती पाटील यांची कहाणी देखील हृदयस्पर्शी आहे. चाळीस हजार रुपये फी देऊन त्यांनी ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण घेतले. पंचवीस हजार रुपये खर्चून साहित्य घेतले. शहराच्या मध्य भागात मध्यवर्ती भागात व्यवसाय सुरू केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल या विचारांनी त्यांनी  भाड्याचे घर घेऊन ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरूही केला आणि लॉकडाऊन सुरू झाला. व्यवसाय तर बंद झालाच.  पण त्याचे नवे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या घरात परतावं लागलं, कारण आता भाडे परवडले  नसते. पाच हजार रुपयाच्या भाड्याची बाकी  द्यायची आहे. पतीचा पगारही आता कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पती पार्लर साठी आर्थिक पाठबळ देऊ शकत नाही. कमी भाड्याचं दुसरे घर  मध्यवर्ती भागात आता घ्यावं असा त्यांचा विचार आहे.  सणासुदीला आणि मुख्यत: दिवाळीला ग्राहक वाढतील अशी त्यांना आशा वाटते. पण ग्राहक नाही आले तर कसा निभाव लागणार अशी त्यांना रास्त भीतीही वाटते.
Photo Credit : Vatsal Kariya
  • मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि केशशिल्पी मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकिशोर वर्मा यांना या कठीण परिस्थितीची कल्पना आहे. या व्यावसायिकांना किती हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत त्याची जाणीव आहे. राज्य शासन, आपला पक्ष आणि सेन समाज संस्थेच्या वतीने त्यांनी समाजपयोगी अनेक उपक्रम हाती घेतले.
  • व्यावसायिकांना मदत केली पाहिजे असा प्रयत्न आहे. पण केश कर्तनालयाच्या पारंपारिक व्यवसायावरच केवळ विसंबून राहू नका असा त्यांचा सल्ला आहे. कुटुंबातील इतरही स्त्री पुरुषांनी दुसरे व्यवसाय शोधले पाहिजे. भाजीपाला, फळे विका, शिवण काम करून पैसे कमवा असे उत्पन्नाचे मार्ग शोधा असे त्यांचे सांगणे आहे.
  • फक्त मध्य प्रदेशातच ही परिस्थिती नाही, तर उत्तर प्रदेश, बिहार अशा इतर राज्यातही नव्या वाटा शोधणे आवश्यक आहे. कर्ज बाजारी झालेल्या शंभरेक जणांनी आत्महत्या केल्या, तसे आपले कुणाचे होऊ नये या साठी नवे मार्ग शोधू या, असा नंदकिशोर वर्मा यांचाचा आग्रह आहे.

Contributed by : Srishti Jahagirdar, Umang Bafna, Barkha Pawar, Sakshi Kadam,Vatsal Kariya, Mohini Sharma,Raj Kalekar, Prattay Basu, Fatima Inamdar, Sheetal Akhade,Pratiksha Jadhav

conceived by  : Dr. Kiran Thakur

Subedited by : Prof. Abhishekh Bhosale, Prof. Ankit Singh

(विश्वकर्मा विद्यापीठाच्या  सेंटर ऑफ कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट साठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी सादर केलेले  लेख कोणत्याही  माध्यमाने प्रकाशित केल्यास आम्हाला आनंद वाटेल. या साठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. संबंधित लेखकाला आणि सेंटरला श्रेय द्यावे एव्हढीच अपेक्षा आहे- डॉ किरण ठाकूर,  विश्वकर्मा विद्यापीठ सेंटर ऑफ कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट)